‘ लायकीत रहा नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू ‘, मनसेला जिव्हारी लागलेली पोस्ट नक्की काय ?

शेअर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर मनसेचे पुण्यातील नेते अक्षरश: तुटून पडले आहेत. ‘लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेचे स्थानिक नेते वसंत मोरे यांनी प्रवीण गायकवाड यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळं राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाली, असे राज ठाकरे म्हणाले होते त्यानंतर हा वाद सुरु झाला. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं?,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला प्रवीण गायकवाड यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिलं आहे. प्रवीण गायकवाड यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका करताना, ‘ राज ठाकरे म्हणजे राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला माणूस आहे. त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला हा प्रश्न विचारण्याचं धाडस राज ठाकरेंनी दाखवावं,’ असं म्हटलं होत सोबतच प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी राज यांना दिला होता .

प्रवीण गायकवाड यांची ही फेसबुक पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली मात्र मनसेला हे बिलकुल आवडलेले दिसत नाही. पुण्यातील स्थानिक नेत्यांनी गायकवाड यांच्यावर एकेरी भाषेत पातळी सोडून टीका केली आहे. ‘ २०१९ च्या लोकसभेला तू पुण्यातून इच्छुक होतास. मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड असं सांगत गल्लोगल्ली फिरत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार ? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला आहे .

मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील गायकवाड यांच्यावर टीका केली आहे मात्र त्यांनी गायकवाड यांचे नाव घेतलेले नाही. त्या म्हणतात की, ‘ राजसाहेब ठाकरे हे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात. रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक अशी स्पष्ट भूमिका घेतात. एकविसाव्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्यासंदर्भात बोलतात. माणुसकी ही एकच जात आणि महाराष्ट्र हा एकच धर्म मानतात. तरीही काही असंतुष्ट, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलावं . पात्रता सोडून बोललात तर महाराष्ट्र सैनिक व राजदूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं. आमचे राज साहेब नुसतं बोलत नाहीत तर कामही प्रचंड करतात. उगीच लोक ‘कृष्णकुंज’वर अडचणी घेऊन येत नाहीत ‘ .


शेअर करा