अहिल्यानगर शहर व जिल्ह्यामध्ये कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधारी, प्रशासनाला कामगारां विषयी किंचितही आस्था उरलेली नाही. रेल्वे माल धक्क्यावर शेकडो माथाडी कामगार काम करतात. त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील थकीत वेतन वसुली बाबत कामगार कार्यालयाकडून सातत्याने जाणीवपूर्वक चाल ढकल केली जात आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याचे साकडे अहिल्यानगर शिवसेना ठाकरे कामगार आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांना घालण्यात आले.
शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडीचे नेते विलास उबाळे यांच्यासह कामगारांनी दानवे यांना ते शहर दौऱ्यावर आले असता लेखी निवेदन दिले. यावेळी शहर प्रमुख किरण काळे यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू भाले, दीपक भोसले, सुनील त्रिपाठी, रावजी नांगरे, विकेश गुंदेचा, संजय वल्लाकट्टी, राजू औटी, सुनील भोसले, आनंद राठोड, महावीर मुथा, किशोर वाघ, सचिन शेंडगे, सुजय लांडे, ऋतुराज आमले, मिलन सिंग, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, गणेश आपरे, विकास भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, जयराम आखाडे, भगवान शेंडे, दीपक काकडे, सिद्धांत भिंगारदिवे, पोपट लोंढे, भगवान शेंडे, रोहिदास भालेराव, विनोद शिरसाट, सचिन भालेराव, सचिन कापुरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
कामगारांचे प्रश्न मांडताना उबाळे यावेळी म्हणाले, कोट्यावधी रुपयांचे थकीत वेतन अजूनही कामगार कार्यालयाकडून वसूल करणे कामी दिरंगाई केली जात आहे. ठेकेदार, भांडवलदारांना पाठीशी घेतले जात आहे. यापूर्वी थकित वेतनाचा पहिला टप्पा मिळवून घेण्यासाठी कामगारांना आंदोलन, मोर्चे काढावे लागले. वेळ प्रसंगी उपोषणाला बसावे लागले. तेव्हा कुठे पहिला टप्पा मिळाला होता. मात्र आता दुसऱ्या टप्प्यासाठी आपण लक्ष घालून प्रशासनाला सूचना करावी अशी मागणी यावेळी कामगारांनी दानवे यांच्याकडे केली.
किरण काळे म्हणाले, या शहरात कामगार बांधवांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हे कष्टकऱ्यांचे शहर आहे. कष्टकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचे काम कायमच शिवसेना करत आली आहे. स्व. अनिलभैय्या राठोड हे कष्टकऱ्यांचा मोठा आधारवड होते. त्यांच्याच विचारावर पुढे चालत असताना शहरातील कामगार बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना कटिबद्ध आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम कामगार, कष्टकरी यांच्या पाठीशी उभे राहण्याची शिकवण शिवसैनिकांना दिली आहे. राज्यात नाकर्त्यांचे सरकार आहे. असे असले तरी मजबूत विरोधी पक्ष म्हणून आज राज्यात शिवसेना काम करत आहे. अहिल्यानगर मधील कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी विरोधी पक्षनेता म्हणून लक्ष घालेल. तुम्ही काळजी करू नका. मी पाहून घेतो, असे ठोस आश्वासन यावेळी दानवे यांनी दिले.