ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला की पाऊस सुरु होण्याआधीच विद्युत पुरवठा खंडित झालाच असे चित्र संपूर्ण नगर शहरात असून अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे. गुरुवारची अख्खी रात्र संपूर्ण नगरने जवळपास अंधारातच काढलेली असून नगरकरांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.
वीज कार्यालयात पाठपुरावा केला असता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या हे कारण पुढे करण्यात येते सोबतच सध्या सगळीकडेच अडचणी असल्याने थोडा वेळ लागेल असे सांगण्यात येते मात्र किती वेळ लागेल हे स्पष्ट करण्यात येत नाही त्यामुळे विद्युत कार्यालयात हेलपाटे मारण्यापलीकडे नगरकरांकडे काही पर्याय राहिलेला नाही.
एकीकडे पावसाचे वातावरण तर दुसरीकडे दमट आणि उष्ण हवामान त्यात विद्युत पुरवठा खंडित झालेला त्यामुळे डासांच्या सानिध्यात रात्र रात्र जागी राहण्याची वेळ नगरकरांवर आलेली आहे. काही घरांमध्ये असलेले इन्व्हर्टर देखील ठराविक वेळेनंतर बॅटरी संपल्याने निष्क्रिय होतात त्यामुळे सद्य परिस्थितीत मोबाईल कॉम्प्युटर यावरच अनेक व्यवसाय अवलंबून असल्याने कामे देखील खोळंबली जात आहेत.