चित्रा वाघची वाघीण का बनली ? माजी आयपीएस अधिकाऱ्याकडून ‘ पोलखोल ‘

शेअर करा

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घटनेत जसं वनमंत्री राठोड यांचं नाव आलं त्या दिवसांपासून त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या अधिकच आक्रमक झाल्या आहेत.

शुक्रवारी त्यांनी पुण्यात आत्महत्यास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. तर आज नाशकात तब्बल 1 तासांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्यानंतर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी चित्रा वाघ यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

माजी अधिकाऱ्यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये पूजा हिचे वय २१ च्या पुढे असल्याने कायदेशीर बाब पाहता ती सज्ञान आहे त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात ही एकप्रकारे लूडबूडच आहे असे त्यांना सुचवायचे तर दुसरीकडे त्यांनी भाजपच्या संस्कृती गप्पांची देखील पोलखोल करताना देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर देखील टीका केलेली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सुरेश खोपडे काय म्हणतात ?

पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या आणि आरोप वरून वाटते. मी 35 वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटनास्थळावर तपास केला तर तो खून आहे की अपघात आहे, की आत्महत्या आहे की ते आम्ही 99 टक्के ओळखतो. एखाद्या घटनेमध्ये खून असेल तर तो राजकीय दबावाखाली दडपला जातो का? माझे मत असे की, मुळीच नाही…

कारण पोलिस स्टेशन हे काही एकमेव तपास करण्याची यंत्रणा नव्हे. क्राईम ब्रँच, सी आय डी क्राईम, सीबीआय तपास घेऊ शकतात. त्यात जर आढळले की पो.स्टेशन अधिकाऱ्याने माहिती दडविली तर तो अधिकारी सह आरोपी(co accused) केला जावू शकतो. हल्ली कोणीही कोणाला वाचवू शकत नाही. त्यामुळे वानवडी पोलिस योग्य तपास करतील अशी खात्री वाटते.

या केसमध्ये सत्ताधारी मंत्र्याचे नाव घेतले जाते. अशा केस मध्ये राजकीय दबाव असू शकतो पण त्याच बरोबर पोलिसावर विरोधी पक्ष, मीडिया, सामान्य जनता, सोशल मीडिया, याचा दबाव पोलिस यंत्रणेवर असतो. तो भारी ठरतो. तरीही चित्रा वाघ नावाची महिला एवढा आकांड तांडव का करते? त्यांनी तपास पूर्ण व्हायची वाट पाहायल पाहिजे, असे वाटते.

पूजा केसचा खरा तपास व्हायला पाहिजे हे मान्य… दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, हे ही मान्य… पण तिच्या आईवडिलांचा संशय नाही. ती 21 वर्षाची मुलगी होती. कसं जगायचं याचा पूर्ण अधिकार तिला आहे… राज्यघटना तसा तिला पूर्ण अधिकार देते… मग चित्रा वाघा यांना एवढं आक्रमक व्हायचं कारण काय?

एका पूर्ण सेक्युलर विचाराच्या पक्षातून आरएसएस तत्वज्ञानावर आधारित भाजपमध्ये वाघबाईंनी उडी घेतली. का घेतली हे त्यांना नसेल पण लोकांना माहिती आहे. दास, शूद्र व स्रीचे ताडण केले पाहिजे, अशी विचारधारा असलेल्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षात चित्राताई सामील झाल्यात. तिथल्या स्रीयांबद्दल चित्रा ताई किती वेळा पो. स्टेशन मध्ये गेल्या? पूजा नावाच्या सज्ञान महिलेचे खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगत आहात. पक्ष बदलून तुम्ही केलेले बंड हे केवढे मोठे वैचारिक अध:पतन आहे हे ही लक्षात घ्या!

वाघ कधीच पिसाळत नाही. वाघीण पिसाळते. जेव्हा तिच्या पिल्लावर हल्ला होतो तेव्हा… प्रश्न असा आहे की चित्रा वाघ यांच्या पोटच्या मुलीने पूजासारखे वर्तन केले असते तर चित्रा वाघ अश्या वागल्या असत्या का? मुळीच नाही! चित्रा वाघ अश्या का वागतात? चित्रा ताई, देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खुश करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तर हे जोडपं हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृती वर आधारित संस्कृती आणण्याचा विचार मांडतात. पण तुमच्या वहिनीच्या कृतीतील संस्कृतीत ते दिसत नाही. त्यावर ही बोला! अशी एकांगी भूमिका घेवून वाघीण बनता येणार नाही…


शेअर करा