मोठी बातमी.. अखेर पूजा चव्हाणचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट आला

शेअर करा

गेल्या महिनाभरापासून चर्चेचा विषय ठरलेल्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यावर प्रकाश टाकणारा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे.अद्यापपर्यंत तरी पूजा हिच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी काही भाष्य केलेले नाही मात्र ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार पूजा हिचा मृत्यू हा मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला, असे पोस्ट मार्टेम अहवालात नमूद केलेलं आहे.

बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिनं मागील महिन्यात वानवडी येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षानं हे प्रकरण उचलून धरत राज्य सरकारला घेरलं होतं, त्यानंतर अखेर या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

पूजा चव्हाण प्रकरणात इतका गदारोळ होऊनही पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कुठलीही तक्रार न आल्यानं गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. आता पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार पूजाच्या मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर झालेल्या प्राथमिक तपासातूनही जबर दुखापत हेच कारण पुढं आलं होतं. आता शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातून देखील अशीच माहिती समोर आलेली असल्याने एकप्रकारे पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अर्थात वानवडी पोलिसांनी याबद्दल आताच काहीही सांगण्यास नकार दिला आहे. लवकरच आम्ही माध्यमांना सविस्तर माहिती देऊ, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर देखील त्यावरून रोज नवीन नवीन माहिती आणि आरोप समोर येत असल्याने प्रकरणातील गूढ वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. “शिवसेना आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे.

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवलं. या पत्रात त्यांनी आमची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत, असे पूजाच्या आई-वडिलांनी म्हटले होते.

यापूर्वी शांताबाई राठोड यांनी संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला होता. पूजा चव्हाण हिला गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यासाठी पोलिसांनी 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणीही शांता राठोड यांनी केली होती.


शेअर करा