महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या अहिल्यानगर विभागाचा आंधळा कारभार श्रीगोंद्यात समोर आलेला असून श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात चक्क जो गट नंबरच अस्तित्वात आलेला नाही त्या गट नंबरवर पोल्ट्री व्यवसाय करण्यास प्रदूषण महामंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. पोल्ट्रीचा त्रास असह्य झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सावित्रीबाई फुले संकुल तहसील कार्यालयासमोर असलेल्या प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यास सुरुवात केलेली आहे.

आज उपोषणाचा दुसरा दिवस असून निंबवी ग्रामस्थ मागील 125 दिवसांपासून गावातील अनधिकृतपणे सुरू असलेला हा पोल्ट्री व्यवसाय बंद व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतर जी काही कागदपत्रे समोर आली त्यात प्रदूषण महामंडळाने गट क्रमांक 517 /1 या ठिकाणी पोल्ट्री व्यवसायास परवानगी दिली असल्याचे समोर आले . गट क्रमांक 517 हा गावात अस्तित्वात आहे मात्र आज रोजी तरी 517 /1 गट नंबर नसताना प्रदूषण महामंडळाने या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे.

ज्या ठरावाच्या आधारे प्रदूषण महामंडळाने परवानगी दिलेली आहे वास्तविक ग्रामसभेच्या त्या ठरावावर त्या वेळी अंगठाबहाद्दर सरपंच असताना सरपंच म्हणून एक सही केलेली आढळून येत आहे तर या पत्राला कुठलाही जावक क्रमांक नाही त्यामुळे शासकीय यंत्रणेचा कारभार कशा पद्धतीने चालतो हे पुन्हा समोर आलेला आहे.

ज्या कंपनीला ना हरकत देण्यात आली तिचे वेंकीज बॉयलर अँड ब्रीडिंग फर्म असे नाव असून सदर पोल्ट्री फार्म कंपनी ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी कंपनी असल्याने सरकारी यंत्रणा ग्रामस्थांना दाद देत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. सांडपाणी उघड्यावर सोडले जाते तसेच इतर अनेक आरोग्यविषयक अडचणी ग्रामस्थांसाठी निर्माण झाल्यानंतर सरकारी यंत्रणा प्रतिसाद देत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोरच उपोषणाला सुरुवात केलेली आहे.