आयुक्तसाहेब वृक्ष लागवडीची नाटके थांबवा , गुलमोहर रोडची झाड का तोडली ? 

शेअर करा

अहिल्यानगर महापालिकेला वृक्षांची काही एलर्जी आहे की काय ? असा प्रश्न सद्य परिस्थितीत उपस्थित होत आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशी भिस्तबाग परिसरात वृक्षाची लागवड करणाऱ्या मनपा आयुक्तांच्याच कार्यकाळात गुलमोहर रोडवरील पारिजात कॉर्नर इथे सुमारे तीन ते चार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. 

पाईपलाइनसाठी रस्ता खोदण्याच्या कामात हे वृक्ष आडवे येत असल्याचे कारण तोंडी सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात घटनास्थळावर तसे जाणवत नाही सोबतच हे वृक्ष सुमारे 20 ते 25 वर्षांपासून अनेक जणांना सावली देण्याचे काम करत होते आणि त्यांची कुणाला काही अडचण देखील नव्हती. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिका कार्यालयासमोर काही वर्षांपूर्वी घडला होता. महापुरुषांचा पुतळा रोडवरून दिसावा म्हणून मनपा कार्यालयाच्या आवारातच सुमारे चार ते पाच वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आलेली होती. 

नगर शहरात मुळातच झाडांची संख्या कमी असून लोकसंख्या सातत्याने वाढती असल्याकारणाने हवेचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रदूषित हवा नियंत्रित राहावी म्हणून वृक्ष लागवडीवर भर द्यावा लागतो. वृक्ष लागवडीचे नाटक करून आयुक्तांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन कधीही व्यवस्थित होत नाही हे स्पष्ट असताना देखील आहे त्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याचे पाप मनपा प्रशासनाकडून केले जात आहे. 

सर्वसामान्य नागरिकांनी झाडाची किरकोळ फांदी जरी काही कारणास्तव तोडली तर अवघ्या काही मिनिटात पालिकेच्या उद्यान विभागाचे पथक दाखल होऊन फोटो काढून पंचनामा करून संबंधित व्यक्तीला दंडात्मक कारवाईचा इशारा देतात आणि त्यानंतर त्यांचा खिसा ओला केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत मात्र इथे सरकार पुरस्कृत वृक्षाची कत्तल सुरू असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.


शेअर करा