अमरावतीत कलम १४४ लागू तर नितेश राणे म्हणतात की ..

शेअर करा

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये उमटत असून काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून हिंसक घटनांवरून आता राज्यात सत्ताधारी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक मोठं विधान केलं असून आगीत एकप्रकारे तेल ओतण्याचे काम केले आहे .

भाजपा आमदार नितेश राणे काय म्हणाले ?

महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अनेक हिंसक घटना आणि दंगलींमागे रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. प्रत्येक वेळी ते शांतता भंग करतात सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारने एकतर यांच्यावर बंदी आणावी, अन्यथा महाराष्ट्राच्या आम्ही भल्यासाठी त्यांना संपवू. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. कालच्या पेक्षा मोठे पण कोणालाही त्रास झाला नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात, औरंगजेबचे नाही.

अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली असून अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे सोबतच “परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊ या.” असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.


शेअर करा