‘ बरं झालं गेलो नाही ‘ , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..

शेअर करा

नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे म्हटलेले आहे.

शरद पवार म्हणाले की ,’ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडलेली होती ती आणि आज संसदेत जे काही चालले आहे त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपण देशाला काही वर्ष पाठीमागे नेतोय की काय अशी चिंता आता वाटायला लागलेली असून नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाजाची संकल्पना मांडलेली होती मात्र त्याच्या अगदी उलट चित्र संसदेत बघायला मिळालेले आहे. नव्या संसदभवनाच्या उद्घाटनाला साधू आणि महाराज मंडळी आणण्यात आली याचे मला कौतुक वाटले , ‘ असा देखील खोचक टोला त्यांनी भाजपला मारलेला आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले की , ‘ संसदेच्या कुठल्याही कामाची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. मी राज्यसभेचा सभासद आहे तिकडे उपराष्ट्रपती हे प्रमुख असतात. आजच्या सोहळ्यामध्ये लोकसभा अध्यक्ष दिसले याचा आनंद वाटला मात्र उपराष्ट्रपती यांची उपस्थिती देखील दिसून आलेली नाही त्यामुळे हा सगळा सोहळा मर्यादित घटकासाठी होता .

आम्ही जुन्या संसदभवनात अनेक वर्ष काम केलेले आहे त्यामुळे आम्हाला त्या वास्तुबद्दल आस्था आहे. आमची बांधिलकी जुन्या वास्तूमध्ये आहे . दिल्लीत कोणीही व्यक्ती आल्यानंतर त्या माणसाला राष्ट्रपती भवन संसदभवन आणि इंडिया गेट अशा वास्तू आवर्जून दाखवल्या जातात. जुन्या संसदेशी देशाचा संबंध जोडलेला असून या सगळ्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते का केले जात आहे हे माहिती नाही. नव्या संसद भवनाच्या उभारणीच्या कामात देखील सर्वांना सामावून घेतले असते तर चांगले झाले असते मात्र तसेही झाले नाही असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.


शेअर करा