पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरुन माझ्यावर जे आरोप झाले त्यात कोणतंही तथ्य नाही. माझ्यावर नाहक आरोप केले गेले आहेत. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातली आहे. तिच्या मृत्यूचं आम्हालाही दु:ख आहे.आम्ही पूजाच्या कुटुंबीयांसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सगळं बाहेर येईल”, असं वनमंत्री संजय राठोड म्हणाले.
तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यावर झालेले सगळे प्रयत्न फेटाळताना माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले संजय राठोड…?
” पूजा चव्हाण हिचा पुण्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझा समाज सहभागी आहे. परंतु महाराष्ट्रात या सगळ्या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे.”
“मी मागासवर्गीय कुटुंबातून, भटक्या विमुक्त कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे. गेल्या 30 वर्षांचं माझं राजकीय आणि सामाजिक काम उद्धवस्त करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून झालं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं.”
“आपण सर्वजण प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला, मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मी विश्वासाने सांगू शकतो माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सत्य समोर येईल.”
“माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका. तपासातून सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले. तसंच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.”