ऑडिओ क्लिप : अश्रू ढाळत पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा अखेर आत्महत्येचा इशारा

शेअर करा

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली असून ज्योती देवरे यांनी अक्षरश: रडत रडत ही क्लिप बनवली असल्याचे स्पष्ट दिसत आहे, यावरूनच त्यांना किती मानसिक दबावाखाली काम करावे लागत असेल याची कल्पनाही करवत नाही. मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही .

या क्लिपमध्ये ज्योती देवरे यांनी अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे . ऑडिओमध्ये बोलताना मधून मधून रडताना देखील ऐकू येत आहे. क्लिमधील मजकूर मात्र अत्यंत गंभीर असून यांची लवकरात लवकर दाखल घेणे गरजेचे झाले आहे . भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही यावर बोलताना ‘सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे. ‘देव माणूस’ म्हणून वावरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात? तेच आता पहायचे आहे,’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला देखील इशारा दिला आहे .

काय म्हणतात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ?

दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार .

स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही कारण अहिलेलासुद्धा माफी नव्हती. दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतूक होईल. मला म्हणतील ओ शेठ तुम्ही नादच केला थेट. अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरूषला म्हणतात. बायांना कठे शेठ म्हणता येते ?

लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे हे पहा पोथ्या वाचून तुझे नाव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही. त्यातून मला जिद्ध मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरूष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकाऱ्यांना घाबरून वागतील किंवा इतर अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील..

मी दुकानदारांचे लसीकरण करून घेतले म्हणून लोकप्रतिनिधींना राग आला. त्यांनी रात्रीच आरोग्य केंद्रात जाऊन महिला आरोग्य अधिकाऱ्याला खोदून खोदून विचारले. त्यांच्या एका लिपिकाला मारहाण केली. ती महिला अधिकारीही माझ्यासारखीच. तीही रडू लागली. तिच्यावर हात साफ करता आला नाही, म्हणून लोकप्रतिनिधींनी लिपिकाला बदडून काढले. मी त्या महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठांना सांगण्याचा सल्ला दिला. पण वरिष्ठ महिला नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलेची बाजू घेतली नाही. उलट काही वेळातच त्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला की मला लोकप्रतिनिधींनी मारले नाही. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांना कोणीही वाली नाही. त्यांनी ड्रॉवरमध्ये सुसाईट नोट ठेवूनच काम करायचे. या सगळ्यांची नावे मी मुद्दाम घेतली नाहीत. ते पुरुष असले तरी कोणाचे तरी पती, भाऊ, मुलगा आहेत. ते आत गेले तर माझ्या त्या महिला भगिनी उघड्यावर येतील. ज्यांनी त्रास दिला ते मनातून समजून जातील.


शेअर करा