अमित शहांकडून ‘ तो ‘ अपमान जिव्हारी , मोदी सरकारमधील माजी मंत्र्याचा भाजपाला रामराम

शेअर करा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी भाजपला अस्मान दाखवल्यावर प. बंगालमध्ये भाजपमध्ये राहणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनीच आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले’, असं ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे .

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली होती. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा होती. अमित शाह यांनी एकदा दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमावेळी त्यांचा अपमान केला होता तसेच इतरही अनेक वेळा पक्षातून डावलले गेल्याने ते नाराज होते.

बाबुल सुप्रियो यांनी याआधी फेसबुकवरून राजकीय संन्यासाबाबत भाष्य केलं होतं. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अलविदा… मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं. मात्र, आता त्यांनी थेट तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .

गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.


शेअर करा