नगर हळहळलं..अखेर ‘ त्या ‘ दोन्ही भावंडांनी गमावले प्राण , एकावर उपचार सुरु

शेअर करा

नगर तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून विषबाधा झाल्यानंतर दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झालेला आहे तर एका बालकावर सध्या उपचार सुरू आहेत . एका पाच वर्षीय आणि दीड वर्षीय मुलाचा या घटनेत मृत्यू झालेला असून नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील ही घटना आहे. शिवराज बापू म्हस्के ( वय पाच वर्ष ) आणि स्वराज बापू म्हस्के ( वय दीड वर्ष ) अशी मयत भावंडांची नावे असून त्यांचा चुलत भाऊ सार्थक भाऊसाहेब म्हस्के ( वय तेरा ) याच्यावर नगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आठ तारखेला बुधवारी या मुलांनी त्यांच्या घरात सरबत बनवला होता आणि सरबत पिल्यानंतर नऊ तारखेला पहाटेच्या सुमारास शिवराज बापू म्हस्के याला उलट्या होऊ लागल्या . त्याचे वडील त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला . सदर प्रकार हा विषबाधेने झाला असेल असा त्यांना सुरुवातीला अंदाज आला नाही.

दुसरीकडे त्याचा लहान भाऊ असलेला स्वराज याला देखील दुपारनंतर त्रास होऊ लागल्यानंतर तसेच त्यांचा चुलत भाऊ असलेला सार्थक याला देखील त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यानंतर रात्री आठच्या सुमारास स्वराज याने देखील प्राण गमावले तर सार्थक याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . सदर प्रकार हा सरबत पिल्यामुळेच झाला की नेमकी विषबाधा कशातून झाली याचा सध्या तपास सुरू आहे.


शेअर करा