अहिल्यानगर तालुक्यातील केडगावजवळ सोनेवाडी येथील मोढवा वस्ती परिसरात डॉ. अनिल अशोक बोरगे यांनी नदीच्या पुलावर अतिक्रमण करून दवाखान्याची भिंत बांधल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पावसाचे पाणी नदीच्या पात्रात न जाता शेतांमध्येच शिरते त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. पंधरा दिवसात डॉक्टरांनी केलेले अतिक्रमण काढावे यासाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाची पाहणी करून १ जून २०२५ पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आणि नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. अनिल अशोक बोरगे यांनी त्यांच्या दवाखान्याची भिंत नदीच्या पात्रावर अतिक्रमण करणारी बांधली असून ज्यामुळे पावसाचे पाणी नदीतून वाहून जाण्याऐवजी शेतांमध्ये शिरते. २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसले होते, ज्यामुळे हजारो रुपयांचा कांदा, गोठे आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी या समस्येला डॉ. बोरगे यांनी केलेले अतिक्रमण जबाबदार आहे असा आरोप केला आहे.
सोनेवाडीच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या अतिक्रमणामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सोनेवाडी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन सादर करत डॉ. बोरगे यांनी बांधलेली भिंत तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. पुढील १५ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.