पुण्यातील लॉकडाऊनला गिरीश बापट यांचा तीव्र आक्षेप .. पहा काय म्हणाले ?

शेअर करा

नागरिक शिस्तीचे पालन करत नसल्याचा ठपका ठेवत पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे . मात्र घोषणा आधी झाल्याने पुन्हा सोशल डिस्टंशिंगचा फज्जा उडाला. अशा पार्श्वभूमीवर भाजप खासदार गिरीश बापट यांनी सरकारला फैलावर घेतले आहे, ” पुण्यात फक्त तीन टक्के प्रतिबंधित क्षेत्र असताना बाकीच्या ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरले जात आहे? ” असा प्रश्न बापट यांनी विचारला आहे .

पुणे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३६ हजाराच्या जवळ पोहचली आहे. त्याचवेळी या साथीने जिल्ह्यात आतापर्यंत १०११ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी चिंचवड पालिकांच्या हद्दीत स्थिती अधिक गंभीर आहे. पुणे शहरात जवळपास २६ हजार रुग्णसंख्या झाली आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्या साडेसहा हजारावर पोहचली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आलेला आहे .

गिरीश बापट यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली असून, ” अधिकाऱ्यांवर विसंबून राहून लॉकडाऊनसारखे मोठे निर्णय घेतले जाऊ नयेत. अशा महत्त्वाच्या निर्णयात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले पाहिजे. पुण्याच्या हिताचा निर्णय असेल तर आम्ही निश्चितच सहकार्य करू.नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे. कुणी मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, मात्र ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस धरणे योग्य नाही. एकीकडे अनलॉक म्हणतात आणि दुसरीकडे पुण्यासारखं शहर लॉकडाऊन करतात, हे कशाप्रकारचे धोरण आहे ?, असा सवाल गिरीश बापट यांनी केला आहे .

सरकारच्या या निर्णयावर व्यापारी क्षेत्रातून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे . लोकांचे रोजगार संपले आहेत. उद्योग धंदे संपले आहेत अशा परिस्थितीत लॉकडाऊन मुळे गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्या व गुन्हेगारीचे देखील प्रमाण वाढलेले आहे . पुणे शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनीही लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन लावल्यास त्याविरुद्ध उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लॉकडाऊनची घोषणा होताच भाजीपाल्यापासून ते मद्याच्या दुकानांपर्यंत सर्वत्र खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र शुक्रवारी आणि आजही कायम होते . लॉकडाऊनचे दोन टप्पे करण्यात आले असून, १४ ते १८ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत औषधे, दूध, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. १९ ते २३ जुलै या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत थोडी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनआधी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्याने पुन्हा एकदा नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली.


शेअर करा