अहमदनगर(प्रतिनिधी)- मौजे धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील शेतकर्यांच्या जमीन परस्पर लॅण्ड माफियांच्या घशात टाकणार्या एजंटांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व श्रीगोंदा-पारनेर प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथील शेतकर्यांच्या मालकीच्या जमिनी पारनेर तालुक्यातील काही खरेदी विक्री करणारे एजंट लोकांनी मुंबई, पुणे शहरातील लॅण्ड माफियांच्या घशात घालण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील शेतकर्यांच्या जमिनीचा दुय्यम निबंधक पारनेर कार्यालयात व्यवहार झाल्याची चौकशी करून संबंधित लॅण्ड माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.