राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा,सदाभाऊंची जीभ घसरली तर शेट्टी यांचेही जोरदार प्रत्युत्तर

शेअर करा

दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यभरात भाजपा व सहकारी पक्षाकडून आंदोलन सुरू आहे. मात्र दुसरीकडे एकेकाळचे सहकारी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे .राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला असून मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी देखील तोडीस तोड उत्तर देत आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचं खापर माझ्यावर खोत फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत ?

सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. खोत म्हणाले ,’ राजू शेट्टी भंपक माणूस आहे. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे

दोन वेळा खासदार करायला सदाभाऊ खोत त्या रेड्याबरोबर होता त्यावेळी दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळालं नाही मात्र त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला. आता आंदोलन कशासाठी करता ? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?

राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात. या देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. सदाभाऊनं त्यांच्यासारख्या ३००-४०० एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढलेल्या नाहीत, असे देखील सदाभाऊ खोत पुढे म्हणाले

राजू शेट्टी यांनी देखील खोत यांच्या टीकेला तसेच खरमरीत उत्तर दिले असून , ‘ भाजपाच्या आजच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. त्यांच्या आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही. त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत. दूध प्रश्नावर आंदोलन करता. पण दुधाला दर मिळवून देणं राहिलं बाजूला. हे राजू शेट्टींवरच टीका करत बसले आहेत. आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या नावे ३००-४०० एकर जमीन सापडली, तर तिची विक्री करूया. त्यातून आलेले पैसे कडकनाथ कोंबडीत ज्यांचे पैसे बुडाले त्यांना देऊ या ‘ असा देखील चिमटा शेट्टी यांनी काढला आहे.


शेअर करा