पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कट्टरपंथीय व्यक्तींनी देशात प्रचंड द्वेष पसरवला असून तो नाहीसा करणे हेच आपले उद्दिष्ट आहे यासाठी सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना केंद्राच्या सत्तेतून पराभूत करण्याची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेले आहे. ‘ आपला लढा हा वैचारिक असून त्यात कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही ‘ , असे देखील त्यांनी भाजपला ठणकावलेले आहे.
राहुल गांधी यांनी हैदराबाद जवळील नामपल्ली येथे सभा घेतली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की , ‘ काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान उघडल्याचा नारा आम्ही दिलेला होता त्यानंतर माझ्या विरोधात 24 गुन्हे दाखल झाले. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढा सुरू करणे एवढाच माझा दोष होता.
इतिहासात पहिल्यांदाच मला मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा मिळाली . खासदारकी रद्द झाली , बंगला सुद्धा काढून घेतला मात्र या गोष्टी मला नकोच आहेत कारण देशातील कोट्यवधी लोकांच्या मनात मी घर केलेले आहे. माझा लढा हा वैचारिक लढा असून त्यात कुठलीही तडजोड होणार नाही. एमआयएम चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात असंख्य गुन्हे दाखल आहेत मात्र त्यांच्या पाठीमागे कधीच सीबीआय आणि ईडी चौकशी लागलेली नाही कारण विविध राज्यात निवडणूक लढवणे आणि मत विभाजन करून मोदींना मदत करणे असेच त्यांचे काम आहे . बीआरएस भाजप आणि एमआयएम हे एकाच माळेचे मणी आहेत , असे देखील राहुल गांधी यांनी ठणकावली आहे.