रिपब्लिकन वृत्तवाहिनीचा संपादक ‘अर्णब गोस्वामी ‘ याच्याबद्दल महत्वाची बातमी

शेअर करा

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला असून गोस्वामी यांचा तळोजा कारागृहात मुक्काम वाढलेला असून तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली असल्याने ट्विटरवर आणि चॅनेलवर कितीही आरडाओरडा केला तरी कायदा सर्वांना समान असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होते आहे . अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात अर्णब संशयित आरोपी असून त्यास पत्रकार म्हणून अटक केलेली नाही त्यामुळे भाजपला अर्णब विषयावर जनसमर्थन मिळताना दिसत नाही .

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली.

दरम्यान, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.

अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी (७ नोव्हेंबर) संपली. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. आम्ही अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलं होतं.

काय आहे प्रकरण ?

अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते मात्र गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिनं केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. अन्वय नाईक यांची आत्महत्या 5 मे 2018 रोजी झाली होती आणि तत्कालीन भाजप सरकारने या प्रकरणी कोणतीच कारवाई केली नव्हती त्यामुळे अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची न्याय मिळावा म्हणून सातत्याने ससेहोलपट सुरु होती .

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यावर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी एकतर्फी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आज पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्वरी येथून नितेश सारडा यांनाही अटक केली आहे. अर्णब गोस्वामी याच्या कुटुंबाने त्याला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे तर भाजपने महाराष्ट्रातील नेते देखील चक्क मराठी माणसाच्या आत्महत्या प्रकरणात देखील अर्णब याच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत .

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर ‘महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथं कायद्यानुसार कारवाई केली जाते. एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात,महाराष्ट्रात ठाकरे सरकारची स्थापना झाल्यापासून सूडभावनेने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला होता आणि न्यायाची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती मात्र कायदेशीर पद्धतीने सोपस्कार पार पडल्यानंतर अर्णब यास अटक करण्यात आली.


शेअर करा