ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी नगर शहरात पाऊस काही थांबायचे नाव घेत नसल्याने आधीच खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नगर शहरातील रस्त्यांची अक्षरश: पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे . महापालिकेकडून मात्र खड्डे बुजवण्यासाठी म्हणून केवळ जुजबी कामे केली जात असून अनेक ठिकाणी तर चक्क खड्डे बुजवण्यासाठी खडी ऐवजी मुरूम सुद्धा न टाकता चक्क माती टाकण्यात आली असल्याने रस्त्यावरील प्रवास हा नगरकरांसाठी जीवघेणा घसरता प्रवास ठरत आहे .
नगर चौफेरने याआधी देखील शहरातील पटवर्धन चौक, दिल्लीगेट आणि इतर उपनगरातील खड्ड्यांविषयी वृत्त प्रकाशित केले होते . काही प्रमाणात का होईना यानंतर महापालिकेला जाग आली आणि लोकप्रतिनिधींना हाताशी धरून खड्डे बुजवत असल्याचा आव आणण्यात आला आणि झटपट फोटोसेशन उरकण्यात आले, मात्र खड्डे बुजवण्याची कामे ही केवळ नगरकरांची बोळवण करण्यासाठीच केलेली दिसून येत असून एकाच पावसात पुन्हा जैसे थे नव्हे तर अक्षरशः त्याहून बिकट परिस्थिती खड्डे बुजवण्यासाठी माती वापरल्यामुळे झालेली पहायला मिळत आहे.
शहरात इतर ठिकाणी रामचंद्र खुंट, तेलीखुंट, राधाबाई काळे कॉलेज रोड , महेश मंदिर, गुलमोहर रोड या ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून जुजबी दिखाऊ कामे वगळता महापालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. महापालिकेला खडी आणि डांबर अद्याप देखील खड्डे बुजवण्यासाठी मिळालेले दिसत नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ फोटो शेषनमध्ये व्यग्र पहायला मिळत आहेत.
शहरात पथदिव्यांचा देखील बोऱ्या वाजलेला आहे अशात खराब रस्ते असल्याने नागरिक जीव संकटात घालूनच बाहेर पडत आहेत. ‘ आहे ते दिवे आधी नीट लावा एलईडी नंतर लावा , ‘ असे सांगत नगरकर आपला संताप व्यक्त करत आहेत. आधी शहरातले खड्डे आणि पथदिवे ही कामे मार्गी लावण्याऐवजी लोकप्रतिनिधी पिंपळगाव माळवी येथील तलावाच्या डेकोरेशनमध्ये व्यस्त असल्याने नागरिक ‘ आधी खड्डे बुजवा आणि पथदिवे नीट करा ‘ अशी मागणी करत आहेत .