..तसा फोटो तुमचा मी लावतो , जितेंद्र आव्हाड याचे मुख्यमंत्र्याना आव्हान

शेअर करा

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह शब्द आणि फोटो सोशल मीडियात शेअर केले सोबतच त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट देखील केल्या याप्रकरणी अनंत करमुसे नावाच्या एका तरुणाला काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बोलावून कथित मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले होते. सदर प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल वक्तव्य केलेले होते. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला असून कुरमुसे याने जे काही फोटो माझ्या कुटुंबीयांबद्दल आणि माझ्याबद्दल टाकलेले होते ते तुमच्याबद्दल टाकूया अन पाहूया तुम्ही किती सहनशील आहात ते ? असे म्हटलेले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारलेला आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट ?

काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षातील कोणिही सदस्य उपस्थित नसतांना आणि मी स्वत: सभागृहामध्ये उपस्थित नसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमुसे प्रकरणात मी कसा दोषी आहे याचा पाढा वाचून दाखवला. एकतरं न्यायप्रविष्ठ प्रकरण असतांना मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं म्हणजे एकतर पोलिसांवर दबाव आणण्यासारखं आहे आणि जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर देखिल मानसिक दबाव आणण्यासारखं आहे. सत्तेचा गैरवापर हे सरकार करीतच आहे. अनेक शिवसैनिकांची घरं-दारं उध्वस्त केली; तेव्हा कायदा, न्यायव्यवस्था काहीच दिसलं नाही. केवळं मालकाची पत्नी उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर दिसली म्हणून हॉटेल तोडणारे आज आम्हांला कायदा व सुव्यवस्था शिकवायला सभागृहात बोलत होते.

आतापर्यंत 6 महिन्यांत किती जणांचे संसार उध्वस्त केले याचा हिशोब करा. माझा एक साधा सरळ आपल्याला प्रश्न आहे. जो फोटो माझा करमुसेने लावला होता तसा फोटो तुमचा मी लावतो. बघुयात आपल्याला किती सहन होतं ते. करमुसेची पूर्ण बाजू मा. सर्वोच्च न्यायालयात आपणच लढवलीत हे अख्ख्या जगाला माहित आहे. आपणच मला विधानसभेत दम दिला होता की, तुझी एक चौकशी आमच्याकडे आहे लक्षात ठेवं.

दमदाटीने राजकारण करता येत नाही, दमदाटीने सरकार चालवता येत नाही. जे आहे ते न्याय आहे. पण, एखाद्या मुख्यमंत्र्यांना न्यायप्रविष्ठ प्रकरण असतांना सभागृहात बोलणे हे कायद्याला धरुन नाही. हे आपल्या लक्षात आलं असतं तर बर झालं असतं. पण, अर्थात आपल्याला कायदा मान्यच नाही हे आपल्या वागण्यावरुन गेल्या 6 महिन्यांत दिसून आलं आहे. तोंडात येईल ते बोलायचं. सभागृहाचा सन्मान किंवा विरोधी पक्षातील आमदारांचा सन्मान हा आपल्या लेखीच नाही. अर्थात आम्हीही लढायला तयार आहोत. फक्त एवढच लक्षात ठेवा. जे करमुसेने माझ्या बाबतीत केलं ते कोणितरी आपल्याबाबतीत करेल तेव्हा बघुयात आपली किती सहनशीलता आहे ते.


शेअर करा