पुणेकरांसाठी निर्बंध ? काय म्हणाले विभागीय आयुक्त सौरभ राव…

शेअर करा

पुण्यामध्ये गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सर्वाधिक रुग्णसंख्या होती. सध्याची करोना संसर्गाची लाट पाहता ही रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी केलेल्या पाहणी अहवालात काढला आहे.

पुण्यातील वाढती रुग्णसंख्या कमी करायची असल्यास, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत अभ्यास करून येत्या आठ दिवसांमध्ये या संस्थांकडून अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतरच पुण्यात कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

सौरभ राव म्हणाले, ‘ आयसर आणि टीसीएस या संस्थांनी पहाणी अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये सध्याच्या लाटेमध्ये गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे ५० टक्के रुग्णसंख्या होईल, असा अंदाज वर्तविला आहे. आगामी काळात ही रुग्णसंख्या कमी करायची असल्यास कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, याबाबत या दोन्ही संस्थांना अभ्यास करण्यास सांगितले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये या संस्थांकडून त्याबाबतचा अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे ‘

असे निर्बंध लागू शकतात

‘शाळा आणि महाविद्यालय एक महिना बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी फक्त पार्सल सेवा सुरू ठेवणे, बार बंद करणे; तसेच लग्न समारंभ येत्या दोन महिन्यांसाठी बंद ठेवणे यांसारखे निर्बंध लावले गेल्यास किती प्रमाणात रुग्णसंख्या कमी होईल, याबाबत या संस्थांकडून विश्लेषण केले जाणार आहे. या संस्थांचा अहवाल आल्यानंतर आठ दिवसांनी निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील’, असे राव म्हणाले.

शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद ठेवायची की नाहीत, याबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्याबरोबर आज बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. वाढती रुग्णसंख्या पाहता शाळा आणि महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाजही राव यांनी वर्तविला.


शेअर करा