.. अखेर ‘ त्या ‘ आजीच्या खुनाचे रहस्य उलगडले, धक्कादायक माहिती आली समोर

शेअर करा

अखेर एमआयडीसी परिसरातील आजीच्या खुनाचा विक्रमी वेळेत तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे .एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी मिनू (वय १७) हिला तिच्या प्रियकरासह (वय १६) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले आहे . बातमी नागपूर येथील असून मिनू हिच्या अफेअरमुळे तिनेच प्रियकराच्या मदतीने आजीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे . मृत विजयाबाई यांची मिनू ही नात होय.

उपलब्ध माहितीनुसार, विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपुरातच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात. वृद्ध विजयाबाई सप्तक नगरात एकट्या राहायच्या. त्यांच्या मुलीची मुलगी मीनू स्वैर वागत होती. तिने आपल्या आईवडीलांचे घर सोडले होते. ती मित्रांसोबत राहायची. अधूनमधून आजी विजयाबाई यांच्याकडे यायची.

आजी निवृत्त सरकारी कर्मचारी असल्याने तिच्याकडे १० ते १५ लाख रुपये आणि दागिने असल्याचा अंदाज मिनुने बांधला होता. ती एकटीच असल्याने तिचा गेम करून रोकड तसेच दागिने लुटता येईल, आजूबाजूला सीसीटीव्ही वगैरे काही नसल्याने आपले पाप कुणाच्या लक्षात येणार नाही, असे तनूला वाटत होते. आपले अवाजवी खर्च भागविण्यासाठी आजीची हत्या करण्याचा कुविचार तिच्या मनात आला.

तिने प्रियकर जान (नावात बदल) च्या मदतीने कट रचला. त्यात जानचे साथीदार नीलेश प्रकाश पौनीकर, बाबा उर्फ कदिर खान, फरदीन खान आणि आरजू उर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले. १० ते १५ लाख रुपये मिळणार म्हणून आरोपी त्यात सहभागी झाले आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पळून गेले.

शुक्रवारी दुपारी हे हत्याकांड उघड झाल्यानंतर खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विवेक मासाळ यांनी व तपासावर लक्ष केंद्रित केले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही आपली पथके चौकशीसाठी कामी लावली. ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकार ऱ्यांनी विजयाबाई यांची नागपुरात राहणारी नात मीनू घरातून गायब असल्याचे आणि ती वाममार्गावर असल्याचे कळाल्याने पोलिसांनी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यानंतर शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान तसेच आरजूला पकडण्यात आले. त्यांनी हत्येची कबुली दिली. मात्र याच दरम्यान रोकड, दागिन्यांसह मीनू तिचा प्रियकर जानसह फरार झाली होती.

जान यापूर्वी अमरावतीला कामाला होता. तेथे त्याचे मित्र होते. आपले साथीदार पकडले गेल्याचे कळताच मिनू आणि जान अमरावतीला मित्राकडे पळून गेले. जानची मावशी औरंगाबादला राहते. तिच्याकडे जाण्याची त्यांची तयारी होती. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने आज पहाटे २ च्या सुमारास अमरावतीत जाऊन आरोपी जान तसेच मीनूला ताब्यात घेतले आणि पहाटे ५ वाजता त्यांना नागपुरात आणण्यात आले.

या खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग तीन दिवस धावपळ केली. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनीही मदत केली. आज मिनू आणि जान हाती लागल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. मीनू आणि जान वगळता अन्य चार आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे .


शेअर करा