राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. ‘पुरामुळे अनेक भागांत वीज नाही. गिरण्या बंद आहेत. त्यामुळं या भागातील लोकांना गव्हाऐवजी तांदूळ, डाळ आणि रॉकेल दिले जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून बोटीनं डाळ, तांदूळ व पाण्याच्या बाटल्या पोहोचवल्या जातील, अशी माहिती अजित पवार यांनी आज पुणे इथे दिली .
अजित पवार म्हणाले, ‘ पूरग्रस्तांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचवण्यास सरकारचं प्राधान्य आहे. वीज नसल्यामुळं व गिरण्या बंद असल्यामुळं लोकांना गहू देऊन उपयोग होणार नाही. त्यांना तांदूळ, डाळ व रॉकेल दिले जाईल. जेणेकरून लोक खिचडी करून खाऊ शकतील. शिवभोजन केंद्रांची संख्याही वाढवली जाईल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावेत, आदेशाची वाट पाहू नये ‘
राज्यात आतापर्यंत ७६ मृत्यू झाले असून ५९ लोक बेपत्ता आहेत, तर ३८ जखमींवर उपचार सुरू आहेत. ७५ जनावरेही दगावली आहेत. ९० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफची मदत मिळत असून मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं ते म्हणाले.
आणखी काय म्हणाले अजित पवार ?
- हवामान विभागाचे बरेचसे अंदाज आता खरे ठरताहेत
- वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने पर्यायी रस्त्याचे काम वेगाने करणार
- सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातच थांबण्याच्या सूचना
- कोल्हापूरात पाणीपातळी धोकादायक पातळीच्या वर
- धरण खोलीकरणाचा पूरस्थितीशी काहीही संबंध नाही
- जर्मनी, चीनमध्येही प्रचंड पूर आले, तिथंही हानी झाली. प्रचंड पाऊस झाल्यास अशी परिस्थिती ओढवते.
- राजकारण न करता मदत शक्य असेल ती मदत करा
- महाडमध्ये तिळये गावाजवळ काल परवा हेलिकॉप्टरही उतरवणे शक्य नव्हते
- व्हीव्हीआयपींनी दौरा केल्यास प्रशासन त्यातच अडकते त्यामुळे मी पुणे जिल्ह्यातच थांबणार