
संजय दत्तच्या केवळ चाहत्यांनी मागणी केली म्हणून संजय दत्तला शिक्षेतून एक वर्षाची सवलत दिली गेली. सलमान खानसाठी रात्री उशिरा कोर्टाचे दरवाजे उघडले गेले. मात्र आसाराम बापू यांना करोनाची लागण झाली असताना आणि त्यांचे तुरुंगातील वर्तन चांगले असतानाही त्यांची सुटका होत नाही. सेलिब्रिटींना वेगळा न्याय आणि संताना वेगळा न्याय, असे का? असा सवाल नगरमधील छावा संघटनेच्या महिलांनी केला आहे. आसाराम बापूंची पॅरोलवर सुटका करावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
नगरमधील श्री योग वेदांत सेवा समिती व छावा संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले असून, आसाराम बापू मागील आठ वर्षांपासून जोधपूर कारागृहात आहेत. त्यांचे वय ८४ वर्षे आहे. त्यांचे कारागृहातील वर्तन अत्यंत चांगले आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने करोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांच्या बाबतीत दिलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, ७० वर्षांवरील वय असलेल्या विविध व्याधीग्रस्त कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात यावी. असे असूनही जोधपूर कारागृह प्रशासन कशाची वाट पहाते आहे? देशातील सेलेब्रिटींना वेगळा न्याय आणि संतांना वेगळा न्याय? असेच यावरून दिसून येत आहे.
अभिनेता संजय दत्त याला केवळ चाहत्यांच्या मागणीवरून शिक्षेतून एक वर्षाची सूट देण्यात आली. सलमान खान याच्यासाठी रात्री कोर्टाचे दरवाजे उघडले. मात्र, आसाराम बापूंना हेतूपरस्पर बंदिवासात ठेवले आहे. यामुळे सामान्य माणसाचा न्याययंत्रणेवरील विश्वास कमी होताना दिेसतो आहे. सामाजिक न्यायामध्ये विषमता दिसते आहे. म्हणून आसारामजी बापू यांचे वय तसेच त्यांना असलेले आजार यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करून त्यांना त्वरीत मुक्त करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावर १६७ महिलांच्या सह्या आहेत. या पत्राच्या प्रती पंतप्रधान तसेच राजस्थानच्या मुख्यामंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.